Monday, September 5, 2016

बेरंग - भाग एक


कथा म्हणून लिहायला सुरुवात केलेल्या या गोष्टीची बघता बघता लघु कादंबरी झाली. अजून संपादन व्ह्यायचे आहे, पहिल्या भागाच हा अंतरिम खर्डा.

--
बेरंग
--
आता हा नवा अधिकारी आल्यापासून सगळ्यांची हालत खराब झाली आहे, तो पैसे खाऊ देत नाही, स्वतः ही खात नाही. सुरुवातीला आपण याच्याशी मैत्री करून पाहिली. आपल्या लायनीत घ्यायचा प्रयत्न केला, पण काही फायदा नाही. तसा वागायला बोलायला बरा आहे. भरपूर शिकलेला आहे. तालेवार घरातला आहे. ह्याचे वडील देखील अधिकारीच होते, थेट कॅबिनेट सेक्रेटरीच. चिक्कार पैसा धरून आहेत. शिवाय दिसतातही नीटनेटके, श्रीमंत. काही लोक दिसतातच पैसेवाले, चकचकीत. हा त्यातलाच आहे. हे असं इतरानाही दिसतं का हे तपासून पहायला पाहिजे. एकदा चंद्याला विचारू. भडवा आपल्यासारखाच आहे. यथातथा परिस्थितीतून आलेला. पण बिनधास्त असतो. मौजमजा करतो. जोक सांगतो सगळ्याना. जिथे जाईल तिथे पॉप्युलर होतो. शिवाय बायाना घुलवण्यात तर एक नंबर आहे. चंद्या वागायला फारच नैसर्गिक आहे. आपल्यासारखा नाही. आपण मनमोकळे बोलत नाही अशी तक्रार सगळ्यांचीच असते. साली सवयच नाही . आपण फक्त पिल्यावर मोकळ ढाकळं बोलू शकतो. हा कदाचित आपला न्यूनगंड असावा.आपल्या डोक्यात काही खेळ सुरू असतो, आणि आपण त्या खेळात गळ्यापर्यंत बुडलेले. मध्येच कुणीतरी काही विचारतो आणि आपल्या खेळात खंड पडतो. मग आपण काहीतरी बोलून वेळ मारून नेतो.चंद्या आपल्याहून खूपच बरा आणि चतुर.आपण आणि चंद्या दोघानी मिळून या नव्या साहेबाला समजावयाचा बराच प्रयत्न केला. आपण जे करतो ते करप्शन नाही, तर कट प्रॅक्टीस आहे. डॉक्टर लोक करतात तशी. आपण फक्त कमीशन घेतो, पण काम चोख होईल याची खातरजमा करतोच. आपल्या नियंत्रणाखाली बनलेल्या सुरगाव रस्त्याचा दाखला दिला. म्हटलो गाडीत बसून चहा पीत जा. बशीतून एक थेंब सांडायचा नाही एवढा मुलायम रस्ता आहे. एक खड्डा नाही त्यावर. गालाशेठ आपला दोस्त कंत्राटदार आहे. पैसा भरवतो इथून तिथून सगळ्याना पण काम साला चोख बजावतो. पण साहेब बधला नाही, म्हटला भ्रष्टाचार देशाला संपवून टाकेल एक दिवस. या विधानावर चंद्या बावळटासारखा फिदी फिदी हसला होता. आपण नंतर झापला त्याला. म्हटलो तू साला चुतिया आहेस. कुणासमोर काय बोलायचं ते कळत नाही तुला. आपलीच गल्ली असल्यासारखा बरळत सुटतो. तर म्हटला झिगझिग करू नकोस जास्ती. तो साहेब बधेना झाला म्हणून तू वैतागला आहेस. त्याच्या बोलण्यात तसं तथ्य होतं. गेले दोनेक महिने झालेत कंत्राटदार घाबरून फिरकतच नाहीत ऑफिसकडे. संध्याकाळी भेटतात, दारू बिरू पाजतात. सोबती कोंबडी, मटण. दारूही स्कॉच. म्हणतात या साहेबाचं करा काही तरी. आपण म्हणतो तो आपल्यापेक्षा वरच्या हुद्द्यावर आहे. शिवाय त्याच्या बापाची सर्वत्र ओळख. भडवा कॅबिनेट सेक्रेटरी होता. त्याने खा खा खाल्लं त्याच्या काळात पण पोराला वाटतं आपला बाप भली इमानदार. आपण काय झाट वाकडं करू शकत नाही त्याचं. आता तो आहे तोवर बसा उगी शांत. पण कंत्राटदाराची जात मोठी चिकट.कामाच्या माणसाला पटवण्यासाठी वाटेल ते करतात. पार्ट्या, बाया न वाट्टेल ते. एवढी सरबराई करतात की डोक्यात हवा जाते. आपण कुणीतरी मोठे आहोत असं वाटायला लागतं. गेल्या वर्षी आपण एक मोठं टेंडर काढल. त्यात गाडी आली. इथल घर झालं. पुढच्या दोनतीन टेंडरात पुण्यात फ्लॅट झाला. अजून आपलं लग्न व्हायचं न त्या आधीच आपली तीन तीन घरं. लोकांचं एकही होत नाही. साला एके काळी आपली ऐपत नव्हती कोल्ड्रिंक प्यायची. न आता हे थाट. हालत बदलत जाते माणसाची. मागच्या लोकांचं पुण्य म्हणा की आणखी काही. पण दिवस बदलत जातात. पण अनेकाना हे समजत नाही आणि मग ते तिथेच अडकून पडतात. आपल्या सदाकाकासारखे. दरवेळी भेटला की लेक्चर देतो. सचोटीने राहा. पैसा खाणे बरे नाही. करप्शन फार दिवस चालत नाही.भले भले डुबले तिथं तुझं काय? तुझा बाप देवमाणूस होता. कधी कुणाचा एक पैसा शिवला नाही त्यानं. आपण सदाकाकाचं मन राखायला ऐकून घेतो. सदाकाका इमानदार माणूस आहे. आयुष्यभर बँकेत प्यून म्हणून राबला पण पोराना व्यवस्थित शिकवलं. आमचीही वेळोवेळी मदत करायचा. आईला याचा आणि काकूचा मोठा आधार वाटायचा. आता काकाची पोरं आपल्याकडून अडल्यानडल्याला पैसे नेतात.त्याला हे माहितच नसतं.आपण सढळ हाताने देतो. कधी विचारीत नाही कशासाठी पण ते सांगतात. मागे लहान्याच्या घराची सुरुवातीची रक्कम कमी पडत होती म्हणून तो आला. आपण चार लाख असे दिले. येतील तेंव्हा दे म्हटलो. पण तोही इमानदार. हातउसण्याची नोटरी घेऊन आला आणि सही करून देऊन गेला, सहा महिन्यात बिनव्याजी देतो म्हणून. आपण हसलो.तो म्हणाला तुझं हसणं कशासाठी आहे - मी पैसे देणार नाही असं वाटतंय म्हणून का? आपण म्हटलो नाही रे. सध्या वरकमाई बंद आहे, तुझ्याकडं वापस मागायची वेळ येते की काय असं वाटलं म्हणून हसलो. पण खरंच का हसलो आपण. साला हा काळ आणि तो काळ असलं काही स्वतःची पाठ थोपटण्याचा काहीतरी प्रकार होता तो. पैशाची खुमखुमी असतेच माणसाला. काही मान्य करतात काही करीत नाहीत.
यावेळी सदाकाका, त्याची पोरे, काकू आणि सगळा भूतकाळ तेंव्हा डोळ्यांपुढून वाहता झाला. माणसं म्हणजे पाऊलखुणा किंवा वर्षांची चिन्हे बनून राहतात. प्रत्येकाची एक खूण, एक चिन्ह. वडील गेल्यानंतरची भकासी आठवली. घरात आपण आणि आई दोघेच. अधून मधून एखादा दूरचा नातेवाईक भेटायला यायचा. एरवी सदाकाका आणि त्याचं कुटुंब हेच आमचे साथीदार. ते शेजारीच राह्यचे. सणासुदील घरी वगैरे बोलवायचे. आपण तेंव्हाही तिथे तटस्थासारखे वावरायचो. क्वचित बोलायचो. पोर्या लैच कमी बोलतो असं काकी म्हणायची. साधू बोवा बनतो क्काय अशी गंमत करायची. पण आपण निव्वळ वडील गेले म्हणून गप्प झालो होतो का. की ती निव्वळ एक घटना होती आपली सत्वपरीक्षा पाहणारी. हा माणूस तुटतो की तुटत नाही हे बघण्यापुरती तात्कालिक आपदा. एरवी मरणारा सुटतो असे घरीदारी सर्रास बोलतात लोक. मागे उरणार्‍यांचीच अवस्था होते. पण ही दुर्गत सगळ्यांचीच होत असावी. एरवीही या समाजात आपण एकटेच नसतो. आपल्या सभोती माणसांचा अफाट गराडा असतो, त्या गराड्यातल्या प्रत्येकाची एक कथा असते. थोड्या बहुत फरकाने बहुतांची पांगाडीच होते. निदान आपल्या दुनियेतल्या माणसांची तरी. ही दुनिया मध्य शहरी लोकांची होती. वीसेक वर्षांपुर्वी लहान खेडेगावांतून लहान शहरांमध्ये आलेले लोक. या शहरांमधून असणार्‍या गावासारख्या भागांमधून एकत्रित राहणारे लोक. शहरात आले तरी आपली भाषा न आपला चेहेरा जपून राहिलेले लोक. त्यामुळे समुहाच्या सुरक्षिततेत असणारी आपलेपणाची भावना तिथे होतीच. पण आपण या सगळ्यामध्ये राहूनही तुटकच होतो, आहोत. आता तर त्या जीवनाचा मागमूसही राहिलेला नाही आणि आपण खूप लांबवर निघून आलो आहोत. पण आई अजूनही तिथेच राहते. आपण अनेकदा मागे लागूनही तीने ते घर सोडलेलं नाही. म्हणाते तुझ्या वडीलांच्या आठवणी आहेत या घरात. आपण एवढा पैसा कमावला पण तीने कधी काही मागितलं नाही. वडलानी मागे सोडलेलं घर आणि पोस्टातले तीन लाख रुपए, एवढी बेगमी तिला आयुष्यभरासात पुरेशी आहे. वडील गेले त्यानंतर त्या पोस्टातल्या पैशावर मिळणारं व्याज हीच आमची एकमेव कमाई होती. तिच्यावर आईने घर चालवलं. आपलं शिक्षण पूर्ण झालं ते इबीस्या लाऊन लाऊन कसंबसं. आधी पदवी मिळवली आणि मग पदव्युत्तर शिक्षण. तोवर यव वाढून गेलं होतं, सोबतचे गडी करते सवरते झाले होते. कमी शिक्षणामुळे त्यांची गत यथातथाच होती पण निदान कमावते झाले होते. त्यातले एखाद दोन अधून मधून भेटायचे, बियर पाजायचे. आपल्याला ही छानछौक शोभत नाही असं वाटूनही आपण नैराश्य घालवण्यासाठी म्हणून थोडीफार घ्यायचोच. आता गंंमत म्हणून दिवसाआड महागडी पितो तेंव्हा जुने दिवस आठवतात. शिक्षण होऊनही सुरुवातीला हातात काहीच नव्हतं. मग आपण एका विना अनुदानित शाळेवर क्लर्कची नौकरी धरली. आठशे रुपए महिना ठरलेला पण दरमहा मिळेलच असा नेम नव्हता. बघता बघता तिथं साताठ महिने गेले. पैकी चारच महिन्यांचा पगार झाला, बाकी डुबले, पण या पैशाचाही केवढा आधार झाला होता.आपण आईसाठी एक साडी घेतली , घरात काही वस्तु घेतल्या.मग एक दिवस सरकारी परिक्षेची जाहिरात पाहिली आणि अर्ज भरला. अक्कल हुशारीने आधी प्रवेश परिक्षा आणि नंतरची मुलाखत काढते झालो न ह्या नौकरीचा धडा सुरू झाला. पहिल्या वर्षभरात नुसतीच हौसमौज केली. कपडे घेतले.मग एक मोटारसायकल. नातेवाईकानाही काहीबाही भेटी दिल्या. लेकरू लईच गुनाचं हाय ओ माय. काकी कौतुकानं हेल काढून बोलायची. मग बदली झाली. जालन्यातल्या राहत्या घराची डागडुजी करून आपण इथे आलो. इथे येऊन गेल्या काही वर्षांत आपला डील डौल पारच बदलून गेलायं.आई मात्र तिथेच थांबली. कधी मधी येते आपल्यासोबत राहायला. म्हणते भौ लग्न कर. मला मरण्याआधी नातवंडांची तोंडे बघू दे. आपण नुसतीच मान हालवतो. एकतर आपले नातेसंबंध साधारण त्यामुळे चांगल्या शिकलेल्या पोरी सांगून येत नाहीत. त्यात तशी गरजही नाही आणि आपल्याला बंधनात अडकायची इच्छाही नाही अजून. आलेल्या पैशावर अजून हौसमौज करायचीय अजून. एवढ्यात लग्नाची कटकट नको.सोबतच्या रुईकराचे हाल बघतोच आहे की.जरा निवांत बसला की आलाच बायकोचा फोन. पक्का घरघुशा झाला आहे. नाहीतर कसला मुजोर होता. भडवा पुर्णविरामाच्या जागी शिव्या द्यायचा. आजकाल होरे नाहिरे असं काहीसं बोलत असतो. आपण असेच होऊ याची गॅरंटी नाही पण काय सांगा ?

यंदाचा उन्हाळा खूपच तापदायक दिसतो आहे. संध्याकाळ तशी आल्हाददायक असते. दिवसभर पण नुसती काहिली. करोडोंची कंत्राटं पास करत असलो तरी आपण काम करतो ते या जुनाट सरकारी ऑफिसात. इथे एअर कंडीशनिंग नाही. डेझर्ट कूलर दिवसभर आवाज करत सुरू असतात पण जीवाची काहिली काही कमी होत नाही. झक मारली न सरकारी नौकरी धरली. नाहीतर सदाकाकाचा मोठा मुलगा. कुठल्याशा कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. सांगतो की दिवसरात्र भन्नाट एसी सुरू असतात. स्वतःच्या केबिनमध्ये बसून काम करतो निवांत. बरेचदा तर घरूनच काम करतो. शिवाय अधून मधून परदेशातही जातो. जिथे जाईल तिथले फोटो आपल्याला आवर्जून पाठवतो. त्याच्या भाषेत बोलायचं झालं तर जीवनाचा आनंद लुटतो. हे फोटो बिटो आपल्याला उथळपणाचे लक्षण वाटते एरवी, पण ह्या भावाचे मात्र कौतुकच वाटते. मागे पुढे परदेशातच स्थाईक होइन म्हणत असतो. बाकीचे नातेवाईक हटकतात, पण आपण त्याची नेहमीच पाठराखण करतो. मागे त्याने त्याच्या ऑफिसातले काही फोटो दाखवले. चकचकीत, निळसर काचेरी उत्तुंग इमारती. विचार आला, आपण इथे बक्कळ पैसा मिळवतो पण निव्वळ भंगारात काम करतो आहोत. इमारतीतली लिफ्ट कधीच चालू नसते. सगळ्या जिन्यांच्या भिंती लोकानी पानाच्या पिचकार्या टाकून टाकून रंगवलेल्या. शासन लवकरच बजेट काढणार आहे म्हणताहेत, या इमारतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी. कराल बाबा पण तोवर वैताग आहे. शहरातली प्रचंड गर्दी टाळत टाळत इथवर पोचेतो कंटाळायला होतं. त्यात हा जीवघेणा उकाडा. सरकारी कामांची तगतग, दिवसभर भेटायला येणारे लोक, मंत्र्यांचे दौरे आणि वैतागवाण्या इतर अनेक गोष्टी. त्यात आता कुठलातरी सरकारी महोत्सव आला आहे. साहेबाला यात भारी रस. सगळे नियोजन त्याच्याच हातात आहे. त्याच्याबरोबर आपण आणि चंद्या आहोतच. शिवाय सगळी यंत्रणा. साहेब तर साहेब, त्याचा बापही या बाबतीत भलताच रसिया. आजकाल तोही येऊन बसतो ऑफिसात. मोठमोठ्या गप्पा हाणतो. नको तिथे नाक खुपसतो. नवी पिढी तत्ववादी नाही म्हणत असतो. आम्ही कशी कामे केली पहा म्हणतो. एक पैसा घेतला नाही कुणाचा कधी न काय काय. आपण शांतपणे ऐकून घेतो, काही बोलत नाही; पण चंद्या खूपच वैतागतो. एकतर सध्या पैसा मिळत नसल्याने तो निव्वळ कावलेला असतो आजकाल. त्यात सरकारी कार्यालयांची दुनिया छोटीच; कोणी कुठल्या योजनेत किती मलिदा दाबला ह्याची नेटकी माहिती सगळ्यांकडे असते. एक दिवस साहेबाचा बाप फारच रंगवून आपल्या साधेपणाच्या गोष्टी सांगत होता. बराच वेळ त्याची लामन सुरू होती. शेवटी चंद्याकडून राहावले नाही. म्हणाला साहेब आपण आम्हास वडीलधारे. पण आपण आणि तडपल्लीवार साहेबांनी मिळून उभे तिरना धरण लुटून खाल्ले हे अक्ख्या दुनियेला माहिती आहे. साहेबाचा बाप यावर चाटच पडला. संतापून जो निघून गेला तो पुन्हा ऑफिसकडे फिरकलाच नाही. आपण चंदयाला म्हटलो, चंद्या तुझ्या जिभेला हाड नाही, पक्का अवकाळी आहेस. कधी कुणाची उतरवशील नेमच नाही. पण हे काम जबरी केलंस गड्या. म्हातारा जाम इरिटेटींग आहे. बरा कटवला त्याला. अर्थात साहेबाचा बाप नसला तरी साहेब होताच. हा महोत्सव म्हणजे घरचं कार्य असल्यासारखा लगबगीने फिरत होता पाची दिवस महोत्सवाच्या शामियान्यांमधून. परत आपला परिचय करून द्यायचा कलाकारांसोबत. हे अमुक साहेब, तमुक साहेबांचे नातू. मोठे कलाकार आहे. आपण काय कमी कलाकार आहोत का असे यावर चंद्या हळूच बोलायाचा आणि आपण जाम हसायचो. बरं या कलाकार मंडळींचा थाटही भारीच. एकदा एक उस्ताद आले ते एकदम हळदी रंगाचा तलम झब्बा घालून. तोंडात विडा रंगलेला. गळ्यात पिवळी धम्मक सोन्याची साखळी. सोबत चार पाच प्रौढ बायकांचा घोळका. आपण चंद्याला म्हटलो, साला तू नुसताच तब्ब्येतीने रसिया. असं पिवळं धमक राहाता आलं पाहिजे गड्या ! ह्यावर चंद्या नेहमीच्या स्टाईलीत बकाबका हसला. त्यात ह्या उस्ताद साहेबांनी भलं मोठं लेक्चर दिलं. संस्कृती आणि परंपरा, आपला इतिहास. मग त्यांच्या गुरूच्या गोष्टी नि ह्यांच्या गुरूभक्तीच्या. अनेकदा कानाला हात लावत होते. आपण अशावेळी फार बोलत नाही. ऐकून घेतो. कोण जाणे खरंच मोठा माणूस असावा. आपण मूर्खासारखे काही बोलून तोंडघशी पडायचो. आपला चिंतकाचा पिंड नाहीच, पण बर्‍याच गोष्टी पटत नाहीत आपल्याला. या उस्तादांबद्दल्ही असंच झालं. आपण बराच वेळ ऐकत राहिलो आणि मग काहीबाही सांगून तिथून निघते झालो. आपला साहेब एरवी समजदार, पण त्याला प्रसिद्ध लोकांसोबत मैत्री करण्याचा मोठाच सोस.आता तर त्याच्या उत्साहाला धुमारेच फुटले होते. काहीबाही बोलत होता उगाच मध्ये-मध्ये. मध्येच आपला महागडा मोबाईल दाखवत आपण किती संगीत ऐकले आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. नको तिथे वाह वाह म्हणत होता. हे उस्ताद आपल्या क्षेत्रात पोचलेले. मनातल्या मनात साहेबाला मूर्खात काढत असावेत असे त्यांच्या सूचक हास्यावरून वाटत होते. या उस्ताद लोकाना अशा उथळ पण महत्वाच्या चाहत्यांची भारीच गरज असते. कलाकार असो वा सरकारी नोकर. शेवटी प्रत्येकालाच पोट आहे. प्रत्येकाला आपापले दुकान चालवायचे आहेच. भूक ही मूलभूत गरज. त्या नंतर येते ती धनेषणा आणि कामेषणा. या नंतर येणारी सामाजिक महत्वाकांक्षा माणसाला अनेक गोष्टी करायला लावते. उथळांसोबत उथळ होणे ही त्यातलीच एक. त्या रात्री त्या विशिष्ट गराड्यात आपणही बराच वेळ उथळ होते झालो. जगराहाटीला सामील होऊन वाहते झालो. असो.
हा महोत्सव एका मोठ्या वास्तूच्या पायथ्याशी होता. मागे भला मोठा भव्य पहाड. लोक त्याला खडक्या पहाड म्हणत. आपण शामियाना सोडून बाहेर आलो. तिथून चालत चालत मागच्या मोकळ्या मैदानात. मध्यरात्रीची वेळ, शामियान्यातून येणारा वीजदिव्यांचा प्रकाश आणि वर चंद्र चांदण्यांचा सावकाश उजाळा. या उजेडात मागचा पहाड प्रचंड दिसत होता. धीरोदात्त. हजार गोष्टी गिळून घेऊन स्थितप्रज्ञासारखा उभा. आपण किती किरकोळ आहोत ह्याची जाणीव त्यावेळी प्रकर्षाने झाली. बहुतेक गोष्टी आपल्या समजण्यापलिकडच्या. निव्वळ अनुमेय, अपरिमेय. आपण उगाचच पहाडाच्या उंचीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला न मग ओशाळलो. ह्या धीरोदात्त अपरिमेयापुढे आपण निव्वळ मोजण्याइतपतच आहोत.अशा वेळा मोठ्या कठीण असतात. माणूस उगाचच नको त्या गोष्टींबद्दल विचार करू जातो. क्षणभरात डोळ्यांपुढून काय काय फिरून जातं. आपल्या लुटुपुटूच्या लढाया. आपले जय पराजय. चुकलेली हजार गणितं, प्रेम, संभोग, नाती, गोती आणि इतर हजारो गोष्टी. आणि मग एक नीरव शांतता जिच्यात सगळं काही वितळून जातं. उजेड पडण्याचा किंवा आपले सामर्थ्य नाहीसे होण्याचा क्षण. एरवी आपण या सामर्थ्यावर गुपचूप अहंकार बाळगून असतो. माझं शरीर माझ्या ताब्यात आहे. माझी परिस्थिती माझ्या नियंत्रणात आहे. मी सावध आहे. हा अहम मोठा आणि तीव्र असतो. या अशा अनाथ वेळा मात्र सगळ्याच गोष्टींचा विलय घडवून आणतात. उरत असाव्यात त्या ढोबळमानाने फक्त डोंगरापलिकडच्या गोष्टी.आपण त्या निर्व्याज प्रहराचा अनुभव घेतला कितीतरी वेळ. तासाभराने भानावर आलो ते मोबाईलची घंटी ढणाणा वाजली म्हणून.

फोनवर चंद्या असतो. कुठे गायब होतोस रे तू ?लवकर पोडीयमजवळ ये. साहेब भलताच कावलाहे. आपण उसासा टाकत काहीसे वैतागूनच पोडीयमच्या दिशेने चालू लागतो. काय झालं असेल? साहेबाला नक्की कशाचा राग आला असेल याचा विचार करत. आणि आला तरी ही काय वेळ झाली. जवळपास मध्यरात्र. शेवटचा कार्यक्रम संपून गेलेला. लोक आपापल्या घरांच्या दिशेने बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेले. पोचतो तर बघतो साहेब क्लास फोरना झापतोय. पोडीयम जवळ काही कचरा आहे जो उचलण्याची कुणी तसदी घेतलेली नाही. काही प्रेसवाले फोटो काढून, शुटींग करून गेलेत. कर्मचारी आपली बाजू समजावण्याचा प्रयत्न करतात. साहेब, ही जवाबदारी कंत्राटदाराची आहे. आम्ही काय करणार. तरी अर्ध्याहून अधिक कामे आम्हीच करीत आहोत. म्होरक्या असणारा सदाशिव बोलत असतो. उच्चशिक्षित मुलगा. इतर काही मिळत नसल्याने हे काम करणारा. वागायबोलायला एकदम व्यवस्थित. म्हटला, कंत्राटदाराला अनेकदा सांगितलं, पण तो आमचं काहीच ऐकत नाही. यावर साहेब आणखी भडकतो. जवाबदारी ढकलू नका. तुम्ही सगळे कामचोर आहात. एवढा कचरा ? त्यानं नाही उचलला तर तुम्ही का नाही उचलत ? पत्रकारांनी तब्येतीने फोटो काढलेत इथल्या घाणीचे. ह्याची आता देशभरात बोंब होईल.दिवसभर टीव्हीवर दिसत राहील हा कचरा. एवढा महत्वाचा उपक्रम, तुम्हा लोकाना काही समजत नाही. नालायक कुठले. बेजबाबदार. यावर सदाशिव बोलू जातो पण चंदन त्याला मागे लोटीत पुढे जातो. ओ साहेब. शीदा. नीट बोलायचं. नालायक कोनाला बोल्ता ? हँ ? आमाला काय याचा पगार मिळतो काय ? फालतू नई बोलायचं. सदाशिव त्याला रोखू जातो. चंदन गुरकावतो, सद्या भेंचोद मधी पडू नको उगं. मुस्काटात हानीन तुझ्या. बाकीचे दोघे तिघे चंदनला मागे ओढतात.
सगळा घोळका आता दोन भागात विभागला जातो. अनेक आवाज येऊ लागतात. चंदन सगळ्यात लाऊड. लोक आपल्याकडे लक्ष देताहेत हे बघून तो आणखीनच चेकाळतो. जोरजोरात बोलू लागतो. प्रकरण बिघडते आहे म्हणून आपण मध्ये पडतो. साहेबाला तिथून थोडे बाजूला नेतो. साहेब हपकलेला असतो. ही प्रतिक्रिया त्याला अगदीच अनपेक्षित असते. आपण म्हणतो, हे प्रकरण हाताबहेर जाईल. चंदन आडमूठ आहे. आपल्याला बधणारा नाही. त्याच्यामागे सगळे कर्मचारी आहेत. शिवाय चूक तुमचीही आहेच. नालायक कसं काय म्हणू शकता ? लोक गेले चार दिवस राबताहेत. कंत्राटदाराचे लोक दमदाट्या करतात. तो वजनदार माणूस आहे. हे लोक तरी काय करतील ?
साहेब म्हणतो, अहो तुम्ही असं कसं बोलू शकता. मी देखील राबतोच आहे की गेले चार पाच दिवस. शिवाय तुम्ही आणि चंद्रकांतही. मग यानाच काय प्रॉब्लेम आहे? आपण म्हणतो, ते सगळं ठीक आहे पण जे झालं ते टाळता आलं असतं. हे आता वैयक्तिक पातळीवर घेतलं जाईल.सरळ माफी मागून टाका. साहेब एव्हाना वरमलेला असतो पण म्हणतो मी का माफी मागू ? अशाने कर्मचारी शेफारतील. जे होईल ते बघून घेऊ. ठीक आहे, निदान आपण आता इथे थांबू नका. चंदनचा भरवसा नाही. मोकाट आहे.
तिकडे चंद्या मध्ये पडलेला असतो. का बे चंदन. तुझं डोकं फिरलं का ? ही काय पद्धत तुझी साहेबांशी बोलायची ? हा काय मोहल्ला आहे का बे तुझा. यावर चंदन कावतो, हे बगा साहेब, तुमी उगा मधी पडू नका. हे प्रकरन या साहेबाला लई महाग पडनारे. बगून घेऊ. आता चंद्याचाही आवाज चढतो. हे बघ, उगाच आगाऊपणा करू नकोस. तुझी प्रकरणे कमी नाहीत. जास्ती करशील तर गोत्यात येशील. सदा, प्रकाश, याला घेऊन जारे. लाऊन आलेला दिसतो आहे. उद्या ऑफिसात बघू काय करायचं ते. चला निघा आता आपापल्या घराकडं. आपण दुरून बघत असतो. चंद्याने प्रकरण बघता बघता निकाली काढलेलं असतं. निदान तेंव्हापुरतं तरी. थोड्यावेळाने आपण साहेबाला निरोप देऊन चंद्यासोबत तेथून निघतो. चंद्या म्हणतो आज बसू राव निवांत बोलत. या कार्यक्रमाने वीट आणलाय बघ. सरकारी गाडीने मग आम्ही तिथून निघतो.
ड्रायवर गाडी गावाबाहेर असणार्‍या एक हॉटेलाजवळ आणतो. शहराच्या वीसेक किलोमीटर बाहेर ही हॉ टेलांची अख्खी रांगच उभी राहिलेली. पूनम. चांदनी. उजाला अशी नावे असलेली हॉटेलं. हायवेच्या दुतर्फा दिव्यांप्रमाणे चमचमत असतात. काहींच्या दारात उसनं अवसान आणल्यासारखी रोशनाईही असते; अशी की जणू इथे येणारे हा उजाळा पाहून हरखून जात असावेत. काय मौज आहे. बाहेरचा उजेड आणि आतला अंधार ह्यांची सांगड अशा ठिकाणी किती सहज घातली जाते. ह्या हॉटेलांचं एक बरं आहे. इथं रात्रभर दारू पीत बसा कोणी हटकणारं नाही. तसंही आपण सरकारी, आपल्याला कोण काय करणार ? पण एक भीड असतेच माणसात. बाकी चंद्याची ओळख असते इथेही. सरबराई होते. सगळ्यात चांगलं टेबल मिळतं.थोडा वेळ हॉटेलचा मालक येऊन काही बाही बोलत बसतो. आपलं लक्षच नसतं. मघाशी झालेला प्रकार डोक्यात घोळत असतो.हा नेमका कुठला संघर्ष आहे. ह्याला वर्ग संघर्ष म्हणावे का. चतुर्थ श्रेणीबद्दल आपल्याला तसंही नेहमीच वाईट वाटतं. आपण एकेकाची कथा घेऊन मनातल्या मनात चाळत असतो. सदाशिवसारखा मुलगा. थेट एम ए आहे. अत्यंत समजदार, हुशार तरुण. याला याहून चांगली नोकरी मिळू नये? कुणाची चूक होत असावी. व्यवस्थेची, समाजाची की निव्वळ नशीबाची. चंदनसारख्याचं आपण समजू शकतो, तो शिकलेला नाही फार. मुळातच यंग्रट आहे. वालंटर टायपातला. दुसर्‍या बाजूला आपण आहोत. किंवा चंद्या, साहेब. भरपूर पैसे छापणारा या हॉटेलाचा मालक. आपण चंदन किंवा सदाशिव म्हणून जन्माला आलो असतो तर काय झाले असते असा दैवव्यपाश्रयी विचारदेखील आला. नदीच्या दोन तटांवर असल्यासारखे दोन विभक्त समाज आपल्यातून जगत असतात. थोडेसे बरे असणारे थोडेसे बरे नसणार्‍यांचा निवाडा करायला सतत सज्ज असतात. मघाशी आपण चंदनला वालंटर ठरऊन मोकळे झालोत तसे.

बाहेर पाऊस सुरू झालेला असतो. चंद्या काही योजना बनवून सांगत असतो. आपल्याला त्याच्या डोक्याची कमालच वाटते. आपण म्हणतो साला तू काही निचिंतीने बसूच शकत नाहीस. आत हे काय नवीन खूळ काढलंस. म्हणे पंढरपूरला जायचं. कोणत्या तोंडाने देवाला भेटायचं रे.आपण शंभर लफडी केलीत. खा खा पैसा खाल्ला. विठोबा म्हणेल एक हेच राहिले होते मला भेटायला यायचे. चंद्या यावर हसून म्हणतो, अरे चालायचंचं. ल्फडी कोण करत नाही? हँ ? बिनल्फड्याचा माणूस दाखव मला तू ह्या जगात. तुला एक उदाहरण सांगतो. आमचा एक काका होता. दूरचाच पण एका गावत असल्याने बर्‍यापैकी घसट होती. मोठा सात्विक माणूस होता. सगळे म्हणायचे माणूस असावा तर असा. एक दिवस आमच्या बाबांनी ह्याना शेजारच्या गावात बघीतलं दुसर्‍या बाईसोबत. नंतर कळालं की हे साहेब अनेक वर्‍षांपासून दोन घरे चालवीत होते. आता बोल. हँ? यावर आपण हसून म्हणतो अरे चालायचंचं. असेल काही अडचण बिचार्‍याची. काय सांगावे त्याची पहिली बायको त्याला समजूत घेत नसेल. किंवा ती दुसरी बाई जेन्युइन असेल आणि हा खरेच तिच्या प्रेमात पडला असेल? हेच तर. चंद्या उसळून म्हणतो. आपली देखील अडचणच आहे की रे. गरज म्हण वाटल्यास. कोणाला गरज नाही जगात? गरजेपोटी होतात गोष्टी. आपण जे केलं ते कुणीही केलंच असतं. एरवी तू न मीच काय, ही अख्खी दुनियाच करप्ट आहे.
आपण म्हणतो, चंद्या तू गोष्टी जास्तच सरळ करून समजून घेतोस. इतकं साधं आहे का हे ? मार्ग निवडण्याची ढब म्हण हवं तर, पण ती चुकते आहे आपली कुठेतरी. मग आपण काही बाही बोलून गप्प बसतो. हा दारूचा प्रभाव असावा बहुतेक. पण पुन्हा विचार येतो, चंद्या तरी काय चूक बोलतोय. ह्या सगळ्याची पक्की सवय झाली आहे; या इथून दहा वर्षं मागं जायची तयारी नाहीच व्हायची आपली आता. तो अभाव,ते जीवन नकोच पुन्हा.

फोनवर चंद्या असतो. कुठे गायब होतोस रे तू ?लवकर पोडीयमजवळ ये. साहेब भलताच कावलाहे. आपण उसासा टाकत काहीसे वैतागूनच पोडीयमच्या दिशेने चालू लागतो. काय झालं असेल? साहेबाला नक्की कशाचा राग आला असेल याचा विचार करत. आणि आला तरी ही काय वेळ झाली. जवळपास मध्यरात्र. शेवटचा कार्यक्रम संपून गेलेला. लोक आपापल्या घरांच्या दिशेने बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेले. पोचतो तर बघतो साहेब क्लास फोरना झापतोय. पोडीयम जवळ काही कचरा आहे जो उचलण्याची कुणी तसदी घेतलेली नाही. काही प्रेसवाले फोटो काढून, शुटींग करून गेलेत. कर्मचारी आपली बाजू समजावण्याचा प्रयत्न करतात. साहेब, ही जवाबदारी कंत्राटदाराची आहे. आम्ही काय करणार. तरी अर्ध्याहून अधिक कामे आम्हीच करीत आहोत. म्होरक्या असणारा सदाशिव बोलत असतो. उच्चशिक्षित मुलगा. इतर काही मिळत नसल्याने हे काम करणारा. वागायबोलायला एकदम व्यवस्थित. म्हटला, कंत्राटदाराला अनेकदा सांगितलं, पण तो आमचं काहीच ऐकत नाही. यावर साहेब आणखी भडकतो. जवाबदारी ढकलू नका. तुम्ही सगळे कामचोर आहात. एवढा कचरा ? त्यानं नाही उचलला तर तुम्ही का नाही उचलत ? पत्रकारांनी तब्येतीने फोटो काढलेत इथल्या घाणीचे. ह्याची आता देशभरात बोंब होईल.दिवसभर टीव्हीवर दिसत राहील हा कचरा. एवढा महत्वाचा उपक्रम, तुम्हा लोकाना काही समजत नाही. नालायक कुठले. बेजबाबदार. यावर सदाशिव बोलू जातो पण चंदन त्याला मागे लोटीत पुढे जातो. ओ साहेब. शीदा. नीट बोलायचं. नालायक कोनाला बोल्ता ? हँ ? आमाला काय याचा पगार मिळतो काय ? फालतू नई बोलायचं. सदाशिव त्याला रोखू जातो. चंदन गुरकावतो, सद्या भेंचोद मधी पडू नको उगं. मुस्काटात हानीन तुझ्या. बाकीचे दोघे तिघे चंदनला मागे ओढतात.
सगळा घोळका आता दोन भागात विभागला जातो. अनेक आवाज येऊ लागतात. चंदन सगळ्यात लाऊड. लोक आपल्याकडे लक्ष देताहेत हे बघून तो आणखीनच चेकाळतो. जोरजोरात बोलू लागतो. प्रकरण बिघडते आहे म्हणून आपण मध्ये पडतो. साहेबाला तिथून थोडे बाजूला नेतो. साहेब हपकलेला असतो. ही प्रतिक्रिया त्याला अगदीच अनपेक्षित असते. आपण म्हणतो, हे प्रकरण हाताबहेर जाईल. चंदन आडमूठ आहे. आपल्याला बधणारा नाही. त्याच्यामागे सगळे कर्मचारी आहेत. शिवाय चूक तुमचीही आहेच. नालायक कसं काय म्हणू शकता ? लोक गेले चार दिवस राबताहेत. कंत्राटदाराचे लोक दमदाट्या करतात. तो वजनदार माणूस आहे. हे लोक तरी काय करतील ?
साहेब म्हणतो, अहो तुम्ही असं कसं बोलू शकता. मी देखील राबतोच आहे की गेले चार पाच दिवस. शिवाय तुम्ही आणि चंद्रकांतही. मग यानाच काय प्रॉब्लेम आहे? आपण म्हणतो, ते सगळं ठीक आहे पण जे झालं ते टाळता आलं असतं. हे आता वैयक्तिक पातळीवर घेतलं जाईल.सरळ माफी मागून टाका. साहेब एव्हाना वरमलेला असतो पण म्हणतो मी का माफी मागू ? अशाने कर्मचारी शेफारतील. जे होईल ते बघून घेऊ. ठीक आहे, निदान आपण आता इथे थांबू नका. चंदनचा भरवसा नाही. मोकाट आहे.
तिकडे चंद्या मध्ये पडलेला असतो. का बे चंदन. तुझं डोकं फिरलं का ? ही काय पद्धत तुझी साहेबांशी बोलायची ? हा काय मोहल्ला आहे का बे तुझा. यावर चंदन कावतो, हे बगा साहेब, तुमी उगा मधी पडू नका. हे प्रकरन या साहेबाला लई महाग पडनारे. बगून घेऊ. आता चंद्याचाही आवाज चढतो. हे बघ, उगाच आगाऊपणा करू नकोस. तुझी प्रकरणे कमी नाहीत. जास्ती करशील तर गोत्यात येशील. सदा, प्रकाश, याला घेऊन जारे. लाऊन आलेला दिसतो आहे. उद्या ऑफिसात बघू काय करायचं ते. चला निघा आता आपापल्या घराकडं. आपण दुरून बघत असतो. चंद्याने प्रकरण बघता बघता निकाली काढलेलं असतं. निदान तेंव्हापुरतं तरी. थोड्यावेळाने आपण साहेबाला निरोप देऊन चंद्यासोबत तेथून निघतो. चंद्या म्हणतो आज बसू राव निवांत बोलत. या कार्यक्रमाने वीट आणलाय बघ. सरकारी गाडीने मग आम्ही तिथून निघतो.
ड्रायवर गाडी गावाबाहेर असणार्‍या एक हॉटेलाजवळ आणतो. शहराच्या वीसेक किलोमीटर बाहेर ही हॉ टेलांची अख्खी रांगच उभी राहिलेली. पूनम. चांदनी. उजाला अशी नावे असलेली हॉटेलं. हायवेच्या दुतर्फा दिव्यांप्रमाणे चमचमत असतात. काहींच्या दारात उसनं अवसान आणल्यासारखी रोशनाईही असते; अशी की जणू इथे येणारे हा उजाळा पाहून हरखून जात असावेत. काय मौज आहे. बाहेरचा उजेड आणि आतला अंधार ह्यांची सांगड अशा ठिकाणी किती सहज घातली जाते. ह्या हॉटेलांचं एक बरं आहे. इथं रात्रभर दारू पीत बसा कोणी हटकणारं नाही. तसंही आपण सरकारी, आपल्याला कोण काय करणार ? पण एक भीड असतेच माणसात. बाकी चंद्याची ओळख असते इथेही. सरबराई होते. सगळ्यात चांगलं टेबल मिळतं.थोडा वेळ हॉटेलचा मालक येऊन काही बाही बोलत बसतो. आपलं लक्षच नसतं. मघाशी झालेला प्रकार डोक्यात घोळत असतो.हा नेमका कुठला संघर्ष आहे. ह्याला वर्ग संघर्ष म्हणावे का. चतुर्थ श्रेणीबद्दल आपल्याला तसंही नेहमीच वाईट वाटतं. आपण एकेकाची कथा घेऊन मनातल्या मनात चाळत असतो. सदाशिवसारखा मुलगा. थेट एम ए आहे. अत्यंत समजदार, हुशार तरुण. याला याहून चांगली नोकरी मिळू नये? कुणाची चूक होत असावी. व्यवस्थेची, समाजाची की निव्वळ नशीबाची. चंदनसारख्याचं आपण समजू शकतो, तो शिकलेला नाही फार. मुळातच यंग्रट आहे. वालंटर टायपातला. दुसर्‍या बाजूला आपण आहोत. किंवा चंद्या, साहेब. भरपूर पैसे छापणारा या हॉटेलाचा मालक. आपण चंदन किंवा सदाशिव म्हणून जन्माला आलो असतो तर काय झाले असते असा दैवव्यपाश्रयी विचारदेखील आला. नदीच्या दोन तटांवर असल्यासारखे दोन विभक्त समाज आपल्यातून जगत असतात. थोडेसे बरे असणारे थोडेसे बरे नसणार्‍यांचा निवाडा करायला सतत सज्ज असतात. मघाशी आपण चंदनला वालंटर ठरऊन मोकळे झालोत तसे.
बाहेर पाऊस सुरू झालेला असतो. चंद्या काही योजना बनवून सांगत असतो. आपल्याला त्याच्या डोक्याची कमालच वाटते. आपण म्हणतो साला तू काही निचिंतीने बसूच शकत नाहीस. आत हे काय नवीन खूळ काढलंस. म्हणे पंढरपूरला जायचं. कोणत्या तोंडाने देवाला भेटायचं रे.आपण शंभर लफडी केलीत. खा खा पैसा खाल्ला. विठोबा म्हणेल एक हेच राहिले होते मला भेटायला यायचे. चंद्या यावर हसून म्हणतो, अरे चालायचंचं. ल्फडी कोण करत नाही? हँ ? बिनल्फड्याचा माणूस दाखव मला तू ह्या जगात. तुला एक उदाहरण सांगतो. आमचा एक काका होता. दूरचाच पण एका गावत असल्याने बर्‍यापैकी घसट होती. मोठा सात्विक माणूस होता. सगळे म्हणायचे माणूस असावा तर असा. एक दिवस आमच्या बाबांनी ह्याना शेजारच्या गावात बघीतलं दुसर्‍या बाईसोबत. नंतर कळालं की हे साहेब अनेक वर्‍षांपासून दोन घरे चालवीत होते. आता बोल. हँ? यावर आपण हसून म्हणतो अरे चालायचंचं. असेल काही अडचण बिचार्‍याची. काय सांगावे त्याची पहिली बायको त्याला समजूत घेत नसेल. किंवा ती दुसरी बाई जेन्युइन असेल आणि हा खरेच तिच्या प्रेमात पडला असेल? हेच तर. चंद्या उसळून म्हणतो. आपली देखील अडचणच आहे की रे. गरज म्हण वाटल्यास. कोणाला गरज नाही जगात? गरजेपोटी होतात गोष्टी. आपण जे केलं ते कुणीही केलंच असतं. एरवी तू न मीच काय, ही अख्खी दुनियाच करप्ट आहे.
आपण म्हणतो, चंद्या तू गोष्टी जास्तच सरळ करून समजून घेतोस. इतकं साधं आहे का हे ? मार्ग निवडण्याची ढब म्हण हवं तर, पण ती चुकते आहे आपली कुठेतरी. मग आपण काही बाही बोलून गप्प बसतो. हा दारूचा प्रभाव असावा बहुतेक. पण पुन्हा विचार येतो, चंद्या तरी काय चूक बोलतोय. ह्या सगळ्याची पक्की सवय झाली आहे; या इथून दहा वर्षं मागं जायची तयारी नाहीच व्हायची आपली आता. तो अभाव,ते जीवन नकोच पुन्हा.


2

मोठ्याच अंतराळानंतर घरी आलो आहोत. आईला आनंद होतो. ती काहीबाही बोलत राहते. एवढ्यात काय काय होवून गेलयं ते सांगते. दरवेळी एखाद दुसरा नातेवाईक ह्या ना त्या कारणाने गेलेला असल्याचे समजते. दरसाल माणसे पडत जातात. आईचं हे सांगणं बरेचदा माझे फारसे दिवस राहिलेले नाहीट हे सांगणंच असतं. आपण ओळखून विषय टाळतो.ती आपल्यासमोर वैद्यकीय तपासण्यांची अख्खी फाईल मांडते. जणू आपल्याला हे सगळं समजतं आहे अशा उत्साहात आपण ते सगळं बघतो. आईला धीर देतो. ह्यावेळी तिचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे म्हणून डॉक्टरानी तिला काही नवी औषधं सुरू केलीएत. बाटलीतलं ते लालभडक औषध बघून आपण उगाचच अरे वा म्हणतो. भारीच औषध दिसतयं. तुला नक्की आराम पडेल याने.यावर आई नेहमी प्रमाणे भला मोठा उसासा टाकते.
          तिची तगमग या तपासण्या आणि औषधांपेक्षा वेगळी आहे हे आपल्याला समजतं. खरंतर हे आपल्याला अनेक वर्षांपासून समजत आलेलं आहे. तिला नातवंडांचं तोंड बघायचं आहे. तिची अपेक्षा वयपरत्वे रास्तच आहे. एरवी तिचं आयुष्य संघर्ष आणि अभावांतच निघून गेलं होतं. वडील गेल्यापासून ते आपल्याला नौकरी मिळेपर्यंतचा काळ.  तब्बल बारा वर्षं. आमच्या बोल्ण्यात ह्या बारा वर्षांचा उल्लेख नेहमीच येतो. आई म्हणते, बाबा, रामचंद्रालादेखील बारा वर्षं वनवास सहन करावा लागला होता. आपण तर साधी माणसंच.

          मग काही बाही आठवणी निघतात. एखाद दुसरी दुखरी नस. सणासुदीच्या दिवसांमध्ये आजूबाजूच्या घरांमध्ये असणारी लगबग, रोषणाई आणि आपल्या घरातला अंधार आणि उदासी. परिस्थिती नसतानाही आई जमेल ते प्रयत्न करून आपल्यासाठी कपडेलत्ते करायची. आपण तिचं मन राखायचो पण प्रचंड वाईट वाटत राहायचं. आईच्या आनंदाचं काय? आपलं जे झालं ते झालं किमान आपल्या मुलाने चांगलं आयुष्य जगावं अशी तिचा प्रयत्न असायचा. आपण आणि आपले वडील हे तिचं सर्वस्व. वडील गेल्यानंतर आमच्या घराची आणि पर्यायाने आमचीही रया गेली.

          कुटुंबातलं एखादं मरण त्या संपुर्ण कुटुंबाला उध्वस्त करून जावं असं काहीसं होवून गेलं होतं. नातेवाईक, त्यांचे जाणते अजाणातेपणी होणारे उपकार,मदत. त्या उपकारांचं आपल्यावर झालेलं ओझं. हजार गोष्टी आहेत. घरी गेलं की ह्या सगळ्या गोष्टी डोक्यावर येवून कोसळतात. आपल्या डोळ्यांमध्ये सर्वदूर पसरून राहिलेली ही बेरंगी कुठेतरी आपल्या जुन्या दिवसांची देण असावी. खरंतर जगात रंगांची कमतरता नाही. पहाटेची केशरी भगवेपण. रात्रीची अथाह निळाई. रस्त्यावर दुतर्फा फुलणारी पिवळी-जर्द फुलं. आपल्या घरासमोरची जास्वंदी. वाट्टेल तितके रंग आहेत. आपल्याला ह्या सर्वांचा सपशेल विसर पडावा का ? की आपल्या रक्तातंच पाणी साचलं आहे ?


               कधी आला भाऊ ? एक प्रेमळ वयस्कर आवाज आपली तंद्री भंगवतो. द्रौपदामावशी, आईची मोठी बहीण आलेली असते. अरे मावशी ! तू कधी आलीस. आपण गडबडून विचारतो.
    मघाशीच आले बाबा. तुम्हा मायलेकाचं बोलणं सुरू होतं. म्हटलं कशाला खोडा घाला ! ह्यावर आई म्हणते, कायं गं आक्का, काही बोलते. तुझं येणं कसं खोडा होईल बाई? आई पुढे होत बोलते. बैस कशी इथं. मी चहा टाकते तुझ्यासाठी. आई अक्काला बसवून स्वयंपाकघरात लगबगीने जाते. आपल्या बहिणीला भेटून झालेला आनंद तिच्या लगबगीतून स्पष्ट जाणवतो.

  आई आणि अक्का दोघी सख्ख्या बहिणी. दिसतातही एकदम बहिणी बहिणीच. पण बहिणी कमी आणि मैत्रिणीच जास्त आहेत एकमेकींच्या. अक्काचा स्वभाव खूपच मायाळू. तिच्या तुलनेत आई थोडी कठोरच आहे. ऐन तारुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीने आईच्या स्वभावत कडवटपणाच येवून बसला होता. अक्का बिचारी फारच मऊ होती. एवढा मोठा संसार नेटाने सांभाळणारी. तीन पोरं आणि दोन पोरी असा मोठाच कुणबा होता तिचा. हाताला थोडीफार जमीन पण ती देखील कोरडवाहूच. घरी गरिबीचे कायम वास्तव्य. पण अक्काचं मन मोठं होतं. कधी कुणाच्या घरी रिकाम्या हातानं गेली नाही. काहीतरी घेवूनच यायची खायला. नाहीच काही मिळालं तर किमान डझनभर केळी तरी. तिच्या ह्या स्वभावाचं कायम कौतुकच वाटत आलं आहे आपल्याला. ही साधी माणसं, एवढी  मायाळू, एवढी माणुसकी असणारी. आणि दुसरीकडे आपण बघतो ते, ज्यात जगतो ते साधनसंपन्न जग.आपल्यासकट आपल्यासारख्या  कोत्या माणसांनी भरलेलं. दहा प्रकारचे विमे काढूनही आपल्याला नीट झोप लागत नाही. मागे ऑफिसाआतल्या गणपतीसाठी पब्लीकने आपल्याकडून दोन हजार वर्गणी काढून घेतली तर दोन दिवस करमलं नाही आपल्याला.
            बाकी काय, मुलं कशी आहेत ? आपण मावशीच्या एकेका मुलाचे नाव घेवून पृच्छा करतो. धाकला इथे, मधला तिथे. मोठा गावी. अजून कोणकोण कुठंकुठं. मावाशी भरभरून सांगते. आपण समजून घेतो आहोत असे दाखवण्याचा भरपूर प्रयत्न करतो. पण एवढं मोठं गणगोत, ते एका संवादात लक्षात राहणं कठीणंच. गेल्या काही दिवसांत अक्काची आर्थिक स्थिती बर्‍यापैकी सुधारलेली आहे असं समजतं. नाशिककडून आलेल्या पाण्यामुळं तिच्या शेतीचा भाव वधारला आहे. हे ऐकून आपल्याला खरंच आनंद होतो. कुठेतरी एखाद्या चांगल्या कुटुंबाचं भलं होतंय हे पाहून होणारा निरपेक्ष आनंद. मग विषयाला फाटे फुटत जातात आणि तिच्या घराचा विषय निघतो. मुलांनी तिचं घर विकायला काढलं आहे असं सांगून अक्का डोळे टिपू लागते. तिनं आणि तिच्या नवर्‍यानं मोठ्या कष्टाने बांधलेलं हे घर. त्या घरातंच तिनं आपलं बहुतेक आयुष्य काढलेलं. मुलांची दुखणीखुपणी, त्यांचं बालपण. या घरातच तिच्या नवर्‍याचा मृत्यू झाला. ह्या सगळ्या आठवणींचं अधिष्ठान असणारं हे घर मुलांनी बाप मरतो न मरतो तोच वर्षभरात विकायलाही काढलं होतं.

                  रडू नकोस, आक्का. ही तर जगराहाटीच आहे. हे जुनं घरं जाईल तर तुझ्या मुलांची नवी, सुखसुविधांनी युक्त घरं होतील हे का वाईट आहे ?  आपण उगाचंच काहीबाही सांगून तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. एव्हाना चहा घेऊन आलेली आईदेखील काही सांत्वनपर बोलू लागते. आपण आक्काला समजावण्यासाठी म्हणून बोललो खरं पण जुनं जाऊन नवं येण्याची ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा मोठीच जीवघेणी आहे. बरं झालं आपल्याला भावंडं नाहीत असा एक विचारही त्यावेळी मनात चमकून गेला.

       मावशीचं घर कुणा जवळचाच नातलग विकत घेणार आहे. मुलं घर विकून आलेला पैसा सचोटीनं वापरणार नाहीत अशी तिला काळजी वाटते. मोठ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. मधला व्यसनी आहे. धाकल्याची संगत वाईट. शिवाय मुलींना वाटा दिला जाणार नाही, त्यामुळे भविष्यात जावई उलटतील आणि हिस्सा मागायला लावतील अशी शंकादेखील तिला भेडसावते आहे. पैशावरून आताच मुलांमध्ये आणि त्यांच्या बायकांमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. काय गंमत आहे पाहा, सगळी रक्ताचीच नाती, पण एकदा पैसा मध्ये आला की निव्वळ व्यवहार सुरू होतो !

       आई आणि मावशीसोबत खूपच गप्पा होतात. बघता बघता संध्याकाळ होते. जेवणानंतर फिरायला म्हणून बाहेर पडतो. पलिकडच्या गल्लीत वेरुळकर सरांचे घर आहे. त्याना भेटून यावे असा विचार येतो. वेरुळकर आपल्याला इंग्रजी शिकवायचे. तळमळीचे शिक्षक - अत्यंत कमी पगारावर जीव तोडून काम करणार्‍या आदर्शवादी-ध्येयवादी पिढीतले झाड. ह्या लोकांनी आपली उमेदीची वर्षं अशीच घालवून टाकली. ना धड पैसा मिळवला ना केलेल्या कामचे श्रेय. पण तरीही ह्यांच्या चेहेर्‍यावर समाधान दिसून येतं. अशी गोष्ट जी आपल्याला कदाचित कधीच साधणारी नाही.
                 विचार करता करता सरांच्या घराजवळ जावून पोचतो. दार उघडेच असते. सर बल्बच्या उजेडात काहीतरी वाचत बसलेले असतात.
              येऊ का सर ? आपण विचारतो. अरे ! ये की असा ! विचारतोयस काय ? सर आनंदाने स्वागत करतात. आपल्याला बसायला खुर्ची देतात. आपण उगाचच थोडेसे वरमतो. राहू द्या सर. मी घेतो खुर्ची. तुम्ही बसा. सहजच आलो होतो भेटायला उभ्या उभ्या.  अरे वा ! असं कसं तू आमचा आवडता विद्यार्थी . शिवाय आता एवढा मोठा अधिकारी. तुला खुर्ची तर हवीच. सर मिश्कील्पणे बोलतात.
               काय सर. तुमची विनोदबुद्धी भारीच. अहो मी साधा सरकारी कर्मचारी आहे. शिवाय माझ्या डोक्यावर अधिकार्‍यांची अख्खी पंगतच आहे - मी कसला आलोय अधिकारी !  अशा काहीबाही गप्पा होतात. मग चहा. सर आता बर्‍यापैकी म्हातारे दिसू लागले आहेत. सध्या ते आणि काकू दोघेच असतात इथे. दोन्ही मुलांची ल्ग्नं होवून गेलीएत. एक मुलगा पुण्यात असतो तर दुसरा मुंबईत असे समजते.
                     मुलासोबत राहायला का गेला नाहीत हे विचारण्याचं धाडस होत नाही. एक तर म्हातारा तत्वांचा पक्का आहे हे आपल्याला चांगलंच ठाऊक असतं. दुसरं हे की आपली आई तरी कुठे राहते आपल्यासोबत ? खरंतर ह्या जुन्या पिढीला आपली मुळं तोडावीशी वाटत नाहीत. आपण मात्र पक्के उपरे झालेली आहोत. सरांशी बोलता बोलता मागे पडलेल्या गावांची मनातल्या मनात उजळणी सुरू असते.सर अनेक गोष्टींबद्दल बोलतात. बदलत चाललेली कुटूंबव्यवस्था, मुंबई पुण्याकडं स्थलांतरित होत असलेले लोंढे, महाराष्ट्राच्या उर्वरित भागांवर होत असलेला अन्याय. रस्तांवरचे खड्डे, धरणात राहिलेले पाणी. राजकारण, समाजकारण, जातकारण. एक ना हजार गोष्टी.
           सर तसे समाजवादी आहेत. देशात झालेला राजकीय बदल त्याना फारसा आवडलेला दिसत नाही. आपण ह्या बाबतीत थोडे उदासीन आहोत हे संकोचत मान्य करतो. मुळात आपण मोठे झालो तो कालखंड अतिशय कंटाळावाणा होता. साम्यवाद संपल्यात जमा झालेला अणि समाजवाद मोडकळीस आलेला होता. देशात धड सामाजिक बदलही घडून येत नव्हते नि तंत्रज्ञानातही फारशी प्रगती घडून येत नव्हती. फाळणी किंवा आणीबाणी सारख्या मोठ्या घटना आपल्या पिढीने पाहिल्या अथवा भोगल्याच नाहीत. त्यामुळे आपल्या पिढीच्या विशेष राजकीय - सामाजिक भूमिकाच नाहीत असे आपण सरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मग विचार येतो की कदाचित  ह्यामुळेच आपण एवढे निर्ढावलो आहोत. आपल्यापुढे आदर्श अजिबातच उरलेले नाहीत. नपेक्षा आदर्शांच्या पतनाच्या काळाअत आपण जगतो आहोत. सरांना आपण खूप मानतो पण त्यांच्यासारखे अभावांचे आयुष्य घालवण्याची आपली तयारी नाही.

                 पण मग आपल्याला जो एक सल टोचत असतो तो कसला आहे ? आई किंवा वेरुळकर मास्तरांच्या चेहेर्‍यावर जो एक संथ शांत भाव दिसतो तो आपण कधीच का अनुभऊ शकत नाही ?
                        
                              सर ज्या बदलांबद्दल बोलत असतात ती सामाजिक राजकीय स्थित्यंतरे नाही म्ह्टलं तरी आपणही पाहिलीच आहेत. नोकरीपेशा माणसात दिसून येणारं सामाजिक औदासीन्य आपल्यातही पुरेपुर उतरलं आहे. निवांतपणा आणि संथपणाची सवय होऊन गेलीए. मागे त्या कार्यक्रमात जो राडा झाला त्याने आपण  खूपच अस्वस्थ झालो होतो. आपल्या संथपणात ह्या अशा तीव्र गोष्टींचा खंड नकोसा वाटतो. आपण संघर्ष टाळतो.
           पण हे योग्य आहे का ? आपण आपल्या सभोवतालाचा एक अपरिहार्य भाग आहोत. ह्या जगात जे काही उलटपालट घडतं त्यात आपणही गुंतलेलो असतोच. माणसाची समाजात आणि समाजाची माणसात मोठीच हिस्सेदारी असते. आपल्या सारख्या असंख्य डोक्यांची उतरंड म्हणजे आपला हा समाज. उतरंड ह्यासाठी की हा समतल नाही. एकेकाळी पृथ्वी सपाट आहे असं मानलं जायचं. मग विज्ञानाची क्रांती झाली आणि पृथ्वी गोल असल्याचं सिद्ध झालं. पण ह्या गोलाईतही काहि गडबड आहेच. काही गोष्टी वर जातात तर इतर खाली. खालचे वर जाईल आणि जे वर आहे ते यथावकाश खाली येईल असं ओघाने ठरून गेलेलं. आपल्या मागच्या अनेक पिढ्या लौकिकार्थानं खालीच दबून मेल्या असं म्हणायला भरपूर वाव आहे.
    पण आपण वर जातो आहोत क ? जिला उर्ध्वगामी म्हटलं जातं अशा लोकसंख्येत आहोत का ? आपण भरपुर कर भरतो. बर्‍यापैकी पैसा धरून आहोत. बहुधा आपण ह्या उर्ध्वगामी रेषेचा आरंभबिंदू आहोत. आपल्या पुढच्या पिढ्या ह्या खर्‍याखुर्‍या अर्थाने वरच्या प्रतलात जातील आणि जगतील.

    शिवाय हि उतरंड विश्वव्यापी आहेच.म्हणजे अमुक देशात अमुक धर्म भारी. त्या धर्मातही तमुक लोक इतरांहून जड.उबग, शिसारी आणणारा प्रकार. प्रगत देशांनाही वर्गसंघर्ष चुअकलेला नाही. आणि आपण तर जाणूनबुजून मागास देशाचे नागरीक. सरकारी कार्यालयांमधून समाजातलया ह्या खाचखळग्यांचे प्रदर्शन जरा जास्तच ठाशीव पद्धतीने घडून येते. तिथे वर्ग लढ्याला अधि़कृत संरचनेत बांधलं गेलं आहे. माणसांच्या श्रेणी पाडल्या गेल्या आहेत. म्हणजे तुमच्या डोक्यात आणि मनात स्वत:च्या इभ्रतीबद्दल काही संशय येण्यासाठी जागाच ठेवली गेलेली नाहीए. ही प्रथम श्रेणी. इथे उच्चशिक्षित, उच्चपदस्थ लोक वसतात. पांढरीशुभ्र कॉलर असणारे मोठे लोक. त्यानंतर द्वितीय. मग ह्याच क्रमाने खाली. थोडक्यात आपापल्या वजनाप्रमाणे नीटनीट रहा. रेषेत पडा. थोडेही इकडे तिकडे होवू नकात. झालात तर ह्या परमसुखदायी व्यवस्थेतून तुम्हाला त्वरेनं बाहेर केलं जाईल.
             
               एव्हढी आखीव, भर-भक्कम व्यवस्था. आपल्याला शाळेत असताना पाठ्यपुस्तकातल्या पक्की घरे ह्या संज्ञेचं मोठं अप्रुप होतं.वादळवारा, उन पावूस पचवून उभी राहणारी संस्था. तशीच ही व्यवस्था. पक्की तर आहेच पण सीमाकर देखील. तुम्हाला सीमेत बांधून ठेवणारी. ही व्यवस्था नसेल तर बहुतेक अनागोंदी येईल. सर्वत्र गोंधळ माजेल ह्या भीतीच्या बडग्याने सर्वाना एकत्र बांधून ठेवणारी मजबूत साखळी. ह्या व्यवस्थेच्या सीमांमधून होणारा आपला जीवनसंघर्ष. ह्या संघर्षात बरे वाईट, पापपुण्या ह्या सारख्या गोष्टीना कितपत वाव आहे? अजूनही आपल्या सभोती काही लोक नैतिक वागतातच, जसं की ऑफिसातला गायके बाबा. वयस्कर आहे आणि धार्मिक म्हणून त्याला सारे बाबा म्हणतात. बाबाला एक मुलगी आहे आणि एक लहानसं घर.तो कधीही कमीशन घेत नाही. म्हणतो माझा हिस्सा तुम्ही घ्या. मला माझ्या अधिकारात जितकं मिळतं तितकं पुरे.

                बाबा खरोखर पुण्यवान आहे का ? की तो कठल्यातरी चुकीचं प्रायश्चित्त घेतो आहे ? लाच घेणे, भ्रष्टाचार करणे हे पाप आहे का ? की ती ह्या युगाची जनरीत आहे. मोठमोठे खेळाडू, अभिनेत कर बुडवतात. हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का ? सदाकाकाचा लहाना मुलगा - गिरीश - आपल्याला नेहमीच सांगतो की तो टॅक्सी , हॉटेलाची बोगस बिलं देतो कंपनीत. कोण बघतं. शिवाय म्हणतो की ह्या कंपन्या आपल्या जीवावर अब्जो कमावतात. मग आपण काय घोडं मारलंय कुणाचं ?
          एकूण पुण्य म्हणजे काय? आणि पाप कशाला म्हणावं? एक उदाहरण घेऊत. समजा एक अनाचारी बाप आहे ज्याने नाना लबाड्या करून प्रचंड संपत्ती उभी केलीए. त्याची मुले सज्जन आणि सरळमार्गी आहेत. त्याना बापाची कर्मे नकोत - पण त्याचं ऐश्वर्य जे परंपरेनं त्याना मिळून जाणारं आहे, किंवा मिळतं आहे , त्याचं काय ?
        
           आता ह्याच्या उलट बघू. एक अतिशय पुण्यवान माणूस आहे सरळमार्गी. एक छदामही कुणाकडून न घेणारा. त्याची मुले यथातथा वाढली. पुढे मुले नैतिकतेत न बसणार्‍या गोष्टी करून मातब्बर झाली. आता त्या पुण्यवान माणसाने काय करावे ? आपल्या पुण्याचं फळ आपल्या पुढच्या पिढ्याना मिळतं आहे असं म्हणावं का ? की आपल्या मुलांनी नैतिकता सोडून दिलीए म्हणून कुढत बसावं ?

           निर्णय कठीण आहे. पाप करणारा आणि पुण्य करणारा, यथावकाश दोघेही मरतील. कदाचित त्यांचा निवाडा होत असेल. न्यायाचा एक दिवस असतो असं बहुतेक धर्म मानतात; जो कुणीही पाहिलेला, अनिभवलेला वा भोगलेला नाही. एकूण नैतिकता ही मोठी सोयीची गोष्ट आहे. जघन्य अपराधांपासून माणसानं दूर रहावं म्हणून समाजातल्या प्रतिभावंत आणि विचारी माणसांनी घडवलेली गोष्ट. ही नसती तर समाज रानटी झाला असता हे खरंच; ती माणसाला कक्षेत ठेवण्यासाठी हवीच खरी - पण लोकानी जगता जगता तिची सोय करून घेतली. हवी तशी वापरता येण्याजोगी, लवचिक बाब.

  
                असे ह्जार प्रश्न, हजार विवंचना डोक्यात घेवून आपण वापस निघतो. प्रवास ह्या प्रश्न उपप्रश्नांच्या ससेमिर्‍यामुळे नकोसा होत असावा आपल्याला बहुतेक. 
--

अनंत ढवळे

copyright @ Anant Dhavale
(क्रमश: / संपुर्णतः काल्पनिक )
                    
               
            





No comments:

Post a Comment